अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाला मोबाइल केले परत!, बुलडाण्यातील प्रकार; सांगितले “हे’ कारण!!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निकृष्ठ दर्जाचे मोबाइल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाला परत केल्याचा प्रकार बुलडाण्यात १७ ऑगस्ट रोजी समोर आला आहे. शासनाने अंगणवाडी कामकाजासाठी कर्मचाऱ्यांना निकृष्ठ दर्जाचे मोबाइल पुरवले असून, हे मोबाइल सतत नादुरुस्त होतात. दुरुस्तीसाठीच ३ ते ४ हजार रुपये खर्च वसूल केला जातो, अशी तक्रार करत हे मोबाइल शासनाने परत घ्यावेत व अत्याधुनिक मोबाइल द्यावेत, अशी मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली. जमा केलेले मोबाइल त्यांच्याकडे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.
“आयटक’च्या नेतृत्त्वात अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनने हे अनोखे आंदोलन जिल्हा परिषदेसमोर केले. आंदोलनात शशिकला नारखेडे, सुरेखा तळेकार, तुळसाबाई बोपले, शालिनी सरकटे, संगिता ठाकूर, संजना मोकासरे, प्रिती धुमाळ, माधुरी पाटील, संगिता सोनुने, जुबेदा सय्यद अक्रम, अनिता हाडे, उषा शेळके, उर्मिला औतकार, पुष्पा दांडगे, वंदना भालेराव, लता जेऊघाले, राधा धंदर, अलका अंभोरे, रेखा डुकरे, अलका लव्हाळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. या वेळी शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोबाइलची वॉरंटी संपली अाहे. मोबाइल सतत हँग होणे, बंद पडणे, नादुरुस्त होणे असे प्रकार वाढले आहेत. पोषण ट्रॅकर ॲप सदोष असून, मोबाइलची रॅम कमी असल्याने डाऊनलोड होत नाही. राजभाषा मराठी असताना इंग्रजीत माहिती भरण्याची सक्ती केली जात आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.