आता तरी सामान्यांची वीज कापू नका; आमदार श्वेताताई महाले यांचे व्टिट
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य सरकारने शेतकरी व बारा बलुतेदारांना मदत जाहीर न करताच पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. किमान आता तरी गोरगरिबांची वीज कापू नये आणि तोडलेली वीज पुन्हा जोडावी, अशी मागणी चिखलीच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज, 13 एप्रिलला रात्री साडेआठला फेसबुक लाइव्ह करत 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केला. त्यावर आमदार सौ. महाले पाटील यांनी व्टिट करून ही मागणी केली.
15 दिवस सर्वांना घरीच थांबून राहायचे आहे. किमान आतातरी गोरगरीबांचे वीज तोडणे थांबवा आणि तोडलेल्या वीज जोडण्या पुन्हा जोडून द्याव्यात, असे त्या म्हणाल्या. महावितरणने अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनेचेही वीज कनेक्शन कापल्याने भर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, याकडे आमदार सौ. महाले पाटील यांनी लक्ष वेधले. शेतकरी आणि बारा बलुतेदार, सामान्य वर्गाला कोणतीही मदत जाहीर न करता लॉकडाऊनचा निर्णय झाल्याने जनतेच्या त्रासात भर पडणार आहे, असेही त्यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगितले.