आ. संजय गायकवाड उवाच्… 20 टक्के नेते ॲट्रॉसिटीच्या नावाखाली पोट भरतात, कोणत्या समाजाविरुद्ध नाही, गावगुंडाविरुद्ध बोललो…समाज त्याचे समर्थन करतो हे दुर्दैवी!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः समाज ॲट्रॉसिटीच्या खोट्या तक्रारी दाखल करत नाही, पण ज्या काही 10-20 टक्के लोकांचे पोट ॲट्रॉसिटीच्या नावाखाली भरते, तेच त्यांना ॲट्रॉसिटीची तक्रार करायला लावतात. मी कोणत्या समाजाबद्दल, धर्माबद्दल बोललेलो नाही तर गावगुंडाबद्दल बोललो. समाज त्याचे समर्थन करतो हे दुर्दैवी आहे, अशी रोखठोक भूमिका आज, 2 जुलैला बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा घेतली.
मातोश्रीच्या आदेशाने नाही तर माझ्या कार्यालयाचे नाव मातोश्री आहे. या मातोश्रीवरून चितोड्यात आलो, असे म्हणालो होतो, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. ॲट्रॉसिटीची खोटी तक्रार दिली तर रॉबरीचा गुन्हा दाखल करा, असे मी बोललो. कुणाचे आयुष्य वाचत असेल तर खोटेपणा करायलाही हरकत नाही, असे त्यांनी सांगितले. मी सर्व समाजाचा आदर करतो. मात्र जे लोक ॲट्रॉसिटीच्या भरवशावर पोट भरतात. त्यांना माझ्या वक्तव्याचे दुःख झाले असेल. कारण मी ज्याच्याबद्दल बोललो तो गावगुंड आहे, त्याचे अनेक अवैध धंदे चालतात. यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.