चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून; 5 अपत्यांचाही विचार केला नाही…
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चारित्र्याच्या संशयावरून 37 वर्षीय पत्नीचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना शेलगाव देशमुख (ता. मेहकर) येथे 3 मार्चच्या रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी पती गणेश भिकाजी पहारे याला अटक केली आहे.
गणेशचे लग्न नर्मदाबाईशी 2002 मध्ये झाले होते. त्यांना 5 अपत्ये आहेत. तो नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. 3 मार्चला दोघांत वाद होऊन गणेशने गळा आवळून नर्मदाचा खून केला. घटनेची माहिती मिळताच नर्मदाचा भाऊ रवि सिमरे (रा. मालेगाव, जि. वाशिम) याने डोणगाव पोलीस ठाणे गाठून गणेशविरुद्ध तक्रार दिली. तक्रार आणि उत्तरीय तपासणीच्या अहवालावरून डोणगाव पोलिसांनी गणेशविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला तातडीने अटक केली. तपास ठाणेदार दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक शिवाजी राठोड करत आहेत.