चार दिवसांपासून अंधारात असलेल्या डोणगावच्या ग्रामस्थांचा संताप, महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घेराव
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चार दिवसांपासून वीजपुरवठा बंद असल्याने संतप्त नागरिकांनी वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. शेकडो महिला-पुरुष रस्त्यावर उतरले होते. डोणगाव (ता. मेहकर) मध्ये हा प्रकार 12 जूनच्या रात्री घडला.
विठ्ठल रुख्माई प्राथमिक शाळेजवळील सावजी डीपीचा वीज पुरवठा चार दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे हा भाग अंधारात असून, नागरिकांना पिण्यासाठीही घरात पाणी राहिलेले नाही. या ठिकाणी जुनी डीपी बसविण्यात आली होती. मात्र ती देखील पंधरा मिनिटांतच जळाली. त्यामुळे नागरिकांनी वीज कर्मचाऱ्यांना घेराव घालून जाब विचारायला सुरुवात केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी मध्यस्थी करून नागरिकांची समजूत घातली. महावितरणच्या वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर नवीन डीपी बसविण्याची मागणी केली. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी फोन उचलत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.