जिल्हाधिकारी म्‍हणतात, जल, मृदसंधारण कामावर भर द्या, गाव होईल समृद्ध!; सिंदखेड लपालीच्‍या ग्रामस्‍थांना चढला हुरूप!!

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पुढील कालावधीत समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी प्रत्येक गावाने माती समृद्ध करण्यासाठी आणि शिवारात पाण्याची समृद्धी आणण्यासाठी जल व मृदसंधारण कामावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले. पाणी फाऊंडेशनतर्फे २०२० पासून सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेला महाराष्ट्रातील एकूण ३९ तालुक्यांत सुरुवात झाली आहे. त्यात सहभागी …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पुढील कालावधीत समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी प्रत्येक गावाने माती समृद्ध करण्यासाठी आणि शिवारात पाण्याची समृद्धी आणण्यासाठी जल व मृदसंधारण कामावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले.

पाणी फाऊंडेशनतर्फे २०२० पासून सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेला महाराष्ट्रातील एकूण ३९ तालुक्यांत सुरुवात झाली आहे. त्यात सहभागी गावांसाठी फेब्रुवारीत मिनी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पात्र असणाऱ्या गावांचा सन्मान सोहळा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय वॉटर कप द्वितीय पुरस्कार विजेते गाव सिंदखेड लपाली (ता. मोताळा) येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात संबोधित करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. माचेवाड, जिल्‍हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश लोखंडे, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक श्री. ढवळे, जि. प. सदस्य निरंजन वाडे, गटविकास अधिकारी श्री. मोहोळ, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. थोरात, तालुका कृषी अधिकारी श्री. कासार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, की गावाच्या सामूहिक प्रयत्नातून सातत्यपूर्ण काम करीत राहिल्यास मोताळा तालुक्याचा नावलौकिक देशपातळीपर्यंत पोहोचेल. गावाच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाचे पूर्ण क्षमतेने सहकार्य असणार आहे. सन्मान सोहळा झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी सिंदखेड समृद्ध गाव स्पर्धेमध्ये करत असलेल्या कामांची पाहणी केली. त्यामध्ये पर्जन्यमापक स्थळ, गावाने तयार केलेली गवत नर्सरी, बांधावरील वृक्ष लागवड, सोबतच ६७ एकर वर केलेली वृक्ष व गवत लागवडीच्या पाहणीचा समावेश आहे. संपूर्ण शिवारफेरी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत बारकाईने गाव करत असलेल्या कामाची पाहणी करून निरीक्षण केले. गावाची पुढील वाटचाल समजून घेतली.

सन्मान सोहळ्यामध्ये जयपूर, जनुना, महाळुंगी जहागीर, वारुळी, पोखरी, चिंचपूर, पोहा, तिघ्रा, दाभा, उबाळखेड, शेलापूर खुर्द, चिंचखेड नाथ आणि सिंदखेडा या १३ गावांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच पोफळी, लपाली, खामखेड, कोऱ्हाळा बाजार, अंत्री, रिधोरा जहागीर आणि भोरटेक या सात गावांना सन्मानपत्र देऊन गौरवित करण्यात आले. मोताळा तालुक्यातील विजयी गावांचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सन्मान सोहळ्यामध्ये श्रीमती कामिनीबाई राजगुरू, उबाळखेड यांना यूएनडीपी, जलशक्ती मंत्रालय आणि स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने वॉटर वुमन वारियर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक सुखदेव भोसले (पाणी फाउंडेशन, विभागीय समन्वयक) यांनी तर आभार दिलीप मोरे यांनी मानले.