जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो, पीकही घ्या अन्‌ बक्षीसही मिळवा…!; खरीप हंगामासाठी स्पर्धा जाहीर, सहभागी होण्याचे कृषी विभागाने आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव राज्य सरकार करत असते. यातून त्यांचे मनोबल वाढते. त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडते. राज्यात कृषि विभागामार्फत यंदाही खरीप हंगामात पीक स्पर्धा योजना राबविण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव राज्‍य सरकार करत असते. यातून त्यांचे मनोबल वाढते. त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडते. राज्यात कृषि विभागामार्फत यंदाही खरीप हंगामात पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

पिक स्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी एकूण ११ पिके आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५ आहे. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्‍या शेतावर त्या पिकाखाली किमान १० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी ५ व आदिवासी गटासाठी ४ आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम रुपये 300 अर्ज असणार आहे.

स्पर्धेत दाखल करण्याची तारीख व बक्षीस

  • मूग व उडीद पीकसाठी ३१ जुलै, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल पिकासाठी ३१ ऑगस्ट असणार आहे. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, सातबारा, आठ अचा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषि कार्यालयात देण्यात यावे.
  • पीक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस स्वरुप : स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस तालुका पातळी प्रथम ५ हजार रुपये, द्वितीय ३ हजार रुपये व तृतीय बक्षीस २ हजार रुपये असणार आहे. जिल्हा पातळीवर प्रथम पारितोषिक १० हजार रुपये, द्वितीय ७ हजार व तृतीय ५ हजार रुपये आहे. विभाग पातळीवर प्रथम २५ हजार रुपये, २० हजार रुपये व १५ हजार रुपये बक्षीस असणार आहे. तसचे राज्य पातळीवर प्रथम बक्षीस ५० हजार, द्वितीय ४० हजार रुपये व तृतीय बक्षीस 30 हजार रुपये असणार आहे.
  • पीकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. रब्बी हंगाम 2020 मध्ये पिकस्पर्धेसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2021 साठी देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलैपूर्वी तर इतर खरीप पिकांसाठी ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करुन पिक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.