…तर भविष्यात डोलारखेडचे ग्रामस्थ येऊ शकतात संकटात; कलम ११ अधिसूचनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः डोलारखेड (ता. शेगाव) हे गाव जिगाव प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येते. पूर्वी कलम ११ ची अधिसूचना भूसंपादन विभागाने गावासाठी लागू केली होती. मात्र नंतर काही कारणास्तव ती रद्द करण्यात आली. तेव्हापासून या प्रकरणात काहीच कार्यवाही झालेली नाही. गाव बुडित क्षेत्रात येत असल्याने गावठाणाला सुद्धा कलम ११ ची अधिसूचना लागू करावी, असे साकडे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गाव पूनर्वसनाचा ठराव यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाकडून संबंधित विभागास पाठविण्यात आला आहे. मात्र त्यावरही कोणतीच अधिसूचना अथवा कार्यवाही झाली नाही. शासनाने 2023 मध्ये 40 टक्के पाणी अडविण्याचे ठरवले असल्याने हे क्षेत्र व गावठाण दोन्ही पाण्याखाली येऊन आर्थिक व मानसिक दबावाखाली ग्रामस्थ येतील, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंतीही ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर प्रवीण देठे, भगवान देठे, सुपडा देठे, रमेश देठे, दादाराव देठे, प्रकाश देठे, महादेव देठे यांच्या सह्या आहेत.