दहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या!; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे अवघे ३० हजार रुपयांचे कर्जही अल्पभूधारक शेतकऱ्याला फेडता आले नाही. यातूनच नैराश्य येऊन या ३० वर्षीय शेतकऱ्याने गळ्याला फास लावला. ही घटना काल,२३ जुलैला दुपारी तीनच्या सुमारास आळंद (ता. देऊळगाव राजा) येथे समोर आली. कैलासचे १० दिवसांपूर्वीच लग्न झाले होते.
कैलास रामराव ताठे (रा. आळंद) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ताठे यांच्याकडे आळंद शिवारात एक एकर शेती आहे. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. भारतीय स्टेट बँकेच्या देऊळगावराजा शाखेचे त्यांच्यावर ३० हजार रुपयांचे कर्जही होते. त्यामुळे तणावात असलेल्या ताठे यांनी त्यांच्या गुरांच्या गोठ्यात लाकडी बल्लीला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. १० दिवसांपूर्वीच शिवणी आरमाळ येथील मुलीशी त्याचा विवाह झाला होता. आत्महत्येचे कारण कर्जबाजारीपणा आहे की अन्य याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, लहान भाऊ आणि वृद्ध आई- वडील असा परिवार आहे.