दारूड्याने “बनवले’!; रात्रीनंतर आज दिवसभरही शोधकार्य; कथित वाहून गेलेले तिघे आढळलेच नाहीत!
मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील वडाळी येथील पुलावरून तिघे जण वाहून गेल्याची माहिती एका दारूड्याने काल, ३१ ऑगस्टला सायंकाळी गावात दिल्यानंतर गावात खळबळ उडाली. गावकऱ्यांनी १ टक्का शक्यता गृहित धरून तातडीने शोधकार्य हाती घेतले. “बुलडाणा लाइव्ह’ने ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्याची यंत्रणाही हलली. रात्रभर आणि आज, १ सप्टेंबरला दिवसभर शोधकार्य ग्रामस्थ आणि यंत्रणेने राबवले. पण कथितरित्या वाहून गेलेले तिघे आढळलेच नाहीत. त्यामुळे दारूड्याने सर्वांनाच बनवले, अशी चर्चा ग्रामस्थांत होत आहे. मात्र त्याच्यामुळे यंत्रणेची फजिती झाली. रात्रीच अधिकाऱ्यांची फोनाफोनी आणि त्या तिघांच्या शोधासाठी अगदी आज सायंकाळपर्यंत सारेच परेशान होते.
जानेफळ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ठाणेदार राहुल गोंधे स्वतः रात्री १० वाजता घटनास्थळी पोहचले. रात्री १० ते २ वाजेपर्यंत अंधारातही शोध घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते हेही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते. मेहकरचे तहसीलदार संजय गरकल यांनासुद्धा या घटनेची माहिती मिळताच शोधकार्य करण्याचे आदेश त्यांनी दिले. आज, १ सप्टेंबर रोजी सुद्धा परिसरात शोधकार्य राबविण्यात आले. मात्र दारुड्याने सांगितल्याप्रमाणे वाहून गेलेली शाईन दुचाकी सापडली नाही व त्यावरील “ते’ तिघेही सापडले नाहीत. जिल्ह्यात व अकोला जिल्ह्यात कुठेही तीन जण बेपत्ता झाल्याची तक्रारसुद्धा दाखल नसल्याने त्या दारूड्याने सर्वांनाच बनवल्याची चर्चा होत आहे.