पहाटे साडेपाचलाच जिगावमध्ये राडा!; ‘धावा, पकडा, मारा…’आक्रोशाने गाव हादरले!
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिगाव (ता. नांदुरा) येथे 27 एप्रिलची पहाट गावकऱ्यांत दहशत निर्माण करणारी ठरली. भल्या पहाटे साडेपाचलाच मालमत्तेवरून दोन कुटुंबात राडा सुरू झाला. कुऱ्हाड, गुप्ती, चाकू असा सशस्त्र हल्ला एकमेकांवर सुरू झाला. यातील दोघे रक्तबंबाळ झाले. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश पांडुरंग ताठे (37, रा. जिगाव) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की 27 एप्रिलच्या सकाळी झोपेतून उठलो असता 7 ते 8 अनोळखी तोंडाला रुमाल बांधलेले व्यक्ती घरात काहीतरी शोधत असल्याचे दिसल्याने आरडा ओरड केली. तेव्हा माझा भाऊ, आई व पत्नी असे उठले. त्यांनी त्या लोकांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील संदीप हाडे याने त्याच्या हातातील चाकूने मनगटावर चाकू मारून जखमी केले. दुसरा महादेव हाडे याने हातातील गुप्तीने हातावर मारून जखमी केले. यावेळी बंटी व सौरभ यांनी स्टील डबा घेऊन पळून जाताना मला मारहाण केली. स्टीलच्या डब्यात 12 सोन्याचे मनी, सोन्याची पोत (किंमत चाळीस हजार) असा एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल व शेतीचे कागदपत्रे होती. या तक्रारीवरून मामेभाऊ संदीप हाडे, मामा महादेव हाडे, बंटी व सौरभ (रा. सर्व कोदरखेड, ता. नांदुरा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव श्रीपत पाटील (72, रा. कोदरखेड ता. नांदुरा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की गणेश पांडुरंग ताठे, उमेश पांडुरंग ताठे, गोकर्णा पांडुरंग ताठे (रा. जिगाव) हे आमचे नातेवाइक असून, आमच्यामध्ये घराच्या व शेतीच्या हिस्सेवाटीवरून वाद आहे. 27 एप्रिल रोजी माझा मुलगा संदीप पाटील यास उमेशने पकडले तर गणेश ताठे याने माझ्या मुलाच्या डोक्यात कुऱ्हाड मारून जखमी केले. यावेळी गौकर्णा बाई यांनी सुद्धा मुलाला मारहाण केली. या तक्रारीवरून गणेश ताठे,उमेश ताठे, गौकर्णाबाई ताठे (सर्व रा. जिगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास नांदुरा पोलीस करत आहेत.