पिक विमा योजनेत सहभागासाठी उरलेत केवळ दोन दिवस!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२१ साठी लागू करण्यात आली आहे. ही योजना खरीप हंगामातील अधिसूचित पिकांकरिता आहे. योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. अंतिम दिनांक १५ जुलै आहे.
या योजनेसाठी खरीप ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस व मका पिके अधिसूचित करण्यात आली आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा किंवा न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभागासाठी इच्छुक नसल्यास तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या आत सात दिवस आधीपर्यंत देणे आवश्यक आहे. जे शेतकरी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात करून योजनेत सहभागी करून घेण्याबाबत बँकेमार्फत कार्यवाही केली जाणार आहे. गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी, काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे. योजनेत सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार व कर्जदार शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत. या योजनेसाठी जिल्ह्याकरीता रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला नियुक्त करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता येण्यासाठी गावपातळीवर आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्रावर अर्ज भरून योजनेत सहभागी होता येणार आहे. शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण मिळणेस्तव प्रधानमंत्री पिक विमा योजनेत १५ जुलैपर्यंत सहभागी व्हावे. काढणी पश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखमी अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबरनुसार बाधीत पीक व बाधीत क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत याबाबतची सूचना क्रॉप इन्शुरन्स ॲप, संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँक, कृषि व महसुल विभाग यांना कळवावे. तसेच संबंधित रिसायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या rgcl.pmfby@relianceada.com या ईमेलवर, टोल फ्री क्रं 18001024088 या क्रमांकावर कळविण्यात यावे. नुकसान कळविताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे. योजनेत सहभागासाठी नजीकच्या उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एन. एम नाईक यांच्यावतीने करण्यात येत आहे.
असा आहे विम्याचा हप्ता व संरक्षित रक्कम
पिक विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टर खालीलप्रमाणे – खरीप ज्वारी : विमा संरक्षित रक्कम २५ हजार, हप्ता ५०० रुपये (प्रति हेक्टर), मका : विमा संरक्षीत रक्कम ३० हजार, हप्ता ६०० रूपये, तूर : विमा संरक्षित रक्कम ३५ हजार, हप्ता ७०० रुपये, मूग : विमा संरक्षित रक्कम २० हजार, हप्ता ४०० रुपये, उडीद : विमा संरक्षित रक्कम २० हजार, हप्ता ४०० रुपये, सोयाबीन : विमा संरक्षित रक्कम ४५ हजार, हप्ता ९०० रुपये आणि कापूस पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ४५ हजार, हप्ता २२५० रुपये राहणार आहे.
विमा कंपनीचे तालुकानिहाय प्रतिनिधी
संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पिक विमा संदर्भात बाबींचे निरासरण तालुका कृषि अधिकारी कार्यालयात विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या सहकार्याने होणार आहे. कंपनीचे तालुकानिहाय प्रतिनिधी असे ः बुलडाणा : जिल्हा समन्वयक सर्मन कोडीयातर, जिल्हा समन्वयक विशाल मांटे, समन्वयक अमित पवार, चिखली : योगेश लहाने, देऊळगाव राजा : श्रीकृष्ण ढाकणे, जळगाव जामोद : अमोल रहाटे, खामगाव : परमेश्वर खोडके, लोणार : दत्तात्रय पालवे, मलकापूर : मनोहर पाटील, मेहकर : विनोद गाडे, मोताळा : सुमित पवार, नांदुरा : तुषार सरोदे, संग्रामपूर : प्रसाद वनारे, शेगाव : पंकज अरज, सिंदखेड राजा : योगेश मांटे.