बाहेर अनैतिक संबंध असल्याने तिला छळायचा… म्हणून तिने मुलीसह घेतली विहिरीत उडी!; माळवंडी येथील हृदयद्रावक घटने प्रकरणी आज पतीवर आरोप
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बाहेर अनैतिक संबंध असल्याने पत्नीला त्रास द्यायचा. माहेरवरून शेतीचा वाटा मागण्यासाठी तगादा लावायचा… अखेर या छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले आणि चिमुकल्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, 18 मे रोजी माळवंडी (ता. बुलडाणा) येथे घडली होती. या प्रकरणात आज, 19 मे रोजी मृतक विवाहितेच्या वडिलांनी रायपूर पोलीस ठाणे गाठून पती व सासरच्यांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. त्यावरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सौ. पल्लवी गणेश चव्हाण (30, रा. माळवंडी) हिने जान्हवी या आपल्या 3 वर्षीय चिमुकलीसह शिवारातील शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. आज तिचे वडील विष्णू आनंदा पडोळ यांनी तक्रार दिली, की पती गणेश याचे बाहेर अनैतिक संबंध होते. त्यामुळे तो पल्लवीला त्रास देत होता. सासरा जगदीश बापूराव चव्हाण, सासू सुमन, नणंद रेखा प्रदीप सावळे (सर्व रा. माळवंडी) पल्लवीला माहेरवरून शेतीचा वाटा मागण्यासाठी तगादा लावत होते. या छळाला कंटाळून तिने मुलीसह आत्महत्या केली.