मेहनतीचा थर्टीफर्स्ट… कुडकुडत्या थंडीत बळीराजासोबत रविकांत तुपकरांनीही दिले पिकांना पाणी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एकीकडे सर्वत्र थर्टीफर्स्ट जल्लोषात साजरा होत असताना जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे शेतकरी वीज कंपनीच्या अवकृपेने रात्री रब्बी पिके भिजवत होते. शेतकर्यांच्या बारीत आपलेही पाय मातीत रुतवून त्यांचे दुखणे जाणून घेण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मेहनतीचा थर्टीफर्स्ट साजरा केला. रविकांत तुपकर यांनी शेतकर्यांसोबत रात्रभर गव्हाच्या पिकांत बारी दिली. सिंचन …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एकीकडे सर्वत्र थर्टीफर्स्ट जल्लोषात साजरा होत असताना जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे शेतकरी वीज कंपनीच्या अवकृपेने रात्री रब्बी पिके भिजवत होते. शेतकर्‍यांच्या बारीत आपलेही पाय मातीत रुतवून त्यांचे दुखणे जाणून घेण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मेहनतीचा थर्टीफर्स्ट साजरा केला.

रविकांत तुपकर यांनी शेतकर्‍यांसोबत रात्रभर गव्हाच्या पिकांत बारी दिली. सिंचन करताना शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवाय जेवणाची वेळ आली तेव्हा सर्वांनी शेकोटी पेटवून एका जागी चटणी-भाकरीचा आस्वाद घेतला. तालुक्यातील नांद्राकोळी येथील श्रीकृष्ण काळवाघे यांच्या शेतात पिकाला पाणी देत त्यांनी जागल केली. इतर उद्योगांना पूर्णवेळ वीज, पाणी मिळते तसेच पायाभूत सुविधा मिळतात. पण शेतकर्‍यांना पायाभूत सुविधा तर सोडाच पूर्णवेळ साधी वीजही मिळत नाही. रात्री फक्त आठ तासच वीजपुरवठा होतो. जंगली जनावरे, साप-विंचू, काट्याची पर्वा न करता शेतकरी अन्नधान्य निर्मितीचे काम करतो. अंबानी-अदानीला वेगळा न्याय व शेतकर्‍यांना वेगळा न्याय का? असा सवाल करत तुपकरांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नवीन वर्षात दोन्ही सरकारांनी शेतकर्‍यांना पूर्ण वेळ वीज व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत त्यांची रात्री शेतात राबण्याची फरफट दूर करावी, अशी अपेक्षाही तुपकरांनी व्यक्त केली. यावेळी रामभाऊ हुडेकर, संजय काळवाघे, राजेश काळवाघे, गजानन घुबे, विजय काळवाघे, मोहन जाधव, दीपक काळवाघे व इतर शेतकरी उपस्थित होते.