रस्त्यावर चिडीमारी करण्यावरून हटकले म्हणून राडा; नांदुऱ्यातील 22 जणांविरुद्ध दंगलीचे गुन्हे
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रस्त्यावर थांबून अथवा बाजूला बसून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढण्याचे प्रकार काही टवाळखोरांकडून शहरात वाढले आहेत. यातून कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत असून, काल, 12 मार्चला रात्री दहाच्या सुमारास शहरातील गांधी चौकात याच कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. नांदुरा पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून तब्बल 22 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्रवीण कृष्णा वसतकार (रा. नांदुरा) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की फारुख पटेल व पवन इंगळे हे दोघे मोहल्लात चिडीमारी करत होते. त्यामुळे त्यांना इथे बसू नका असे म्हटले असता त्यांनी किसना तायडे, रजा शेख, हिम्मत खान पठाणचा मुलगा व इतर 4 ते 5 जणांना बोलावून मारहाण केली. या तक्रारीवरून या सर्व जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन रेवणनाथ इंगळे (25, रा. शांतीनगर नांदुरा) यानेही तक्रार दिली असून, त्याच्या तक्रारीवरून अजय टाकळकर, प्रवीण वसतकार,मुन्ना पांडव, विठ्ठल माळी, अर्जुन वसतकारयांच्यासह 5 ते 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या 15 दिवसांतील हाणामारीची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी जळगाव जामोद रोडवर व रेल्वे स्टेशन परिसरात सुध्दा असाच काहीसा प्रकार पहावयास मिळाला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाने असा प्रकार वारंवार का घडत आहे याबाबत विचार मंथन करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.शहरात दामिनी पथक कार्यरत करण्याची गरजही व्यक्त होत आहे.