राहेरीच्या पुलावरून “मोठ्यां’ची घुसखोरी आता बंद म्हणजे बंदच!
किनगाव राजा (नीलेश डिघोळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खडकपूर्णा नदीवरील पूल कमकुवत झालेला आहे. त्यामुळे या पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरीही काही वाहने घुसखोरी करत असल्याने महामार्ग प्राधिकरणाने आता पुलाच्या दोन्ही बाजूला अडथळे तयार केले आहेत. आता मोठ्यांची घुसखोरी पूर्णपणे बंद होऊन केवळ छोटी वाहनेच जाऊ शकणार आहेत. ११ सप्टेंबरपासून हा उपाय अंमलात आला आहे.
नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हा राहेरी पूल (ता. सिंदखेड राजा) असून, त्याच्या कामासाठी शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. पूल होईपर्यंत सध्या जड वाहतूक तडेगाव फाटा येथून देऊळगाव मही मार्गे वळविण्यात आली आहे. मात्र हा रस्ता अत्यंत धोकादायक बनल्याने जड वाहने राहेरीच्या पुलावरूनच घुसखोरी करत होते. पोलिसांनी दंड करूनही हा प्रकार थांबत नसल्याने अखेर अडथळे तयार करण्यात आलेत आहेत. पक्के खांब उभे करून त्यावर नऊ फूट उंचीवर हे अडथळे आहेत. त्यामुळे त्याखालून केवळ छोटीच वाहने जाऊ शकतील.