लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच ती घरातून निघून गेली…; शेगाव तालुक्यातील घटना
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्न होऊन तीनच दिवस झालेले असताना नवविवाहिता गायब झाली आहे. जानोरी (ता. शेगाव) येथे ही घटना घडली. ती हरवल्याची तक्रार शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
7 मार्चला बावनबीर येथील अरुणा अकोटकर यांची मुलगी पूजा (24) हिचा विवाह समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे जानोरी येथील किशोर गासे या तरुणासोबत झाला होता. 11 मार्चला दुपारी चारच्या सुमारास पूजा कोणाला काहीही न सांगता जानोरी येथून घरातून निघून गेली. तिच्या अंगात निळ्या रंगाची मोराची डिझाईन असलेली साडी, वेलवेट रंगाचा ब्लाऊज, नवीन चप्पल असून, तिची उंची साडेपाच फूट इतकी आहे. ती हरवल्याची तक्रार पूजाच्या आईचे दीर ज्ञानेश्वर वसंतराव कासे (36) यांनी दिली. ग्रामीण पोलिसांनी हरवल्याची नोंद घेऊन शोध सुरू केला आहे. ही नवविवाहिता कोणाला आढळल्यास त्यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तपास एएसआय गुलाबराव अगडते, पोहेकाँ योगेश जाधव करत आहेत.