लग्नात बोलावले नाही म्हणून तरुणावर प्राणघातक हल्ला; चिखलीतील घटना
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बहिणीच्या लग्नात बोलावले नाही म्हणून तिघांनी तरुणावर प्राणघातक हल्ला केला. यात तरुणाचे डोके फुटले आहे. जीवे मारण्याची धमकीही तरुणांनी दिली. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आकाश राजू वाघ (21, रा. गवळीपुरा ता. चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो दिलीप जाधव यांच्या आरओ पाण्याच्या गाडीवर पाणीवाटपाचे काम करतो. बहिणीच्या लग्नाला त्याने घराशेजारी राहणाऱ्या राहुल गजानन वाघ याला बोलावले नव्हते. तेव्हापासून त्यांच्यात वाद होता. 13 जूनला संध्याकाळी 6 च्या सुमारास बसस्थानकाजवळील आशीर्वाद मेडिकलवरून डोकेदुखीची गोळी घेऊन घरी येत असताना मेडिकलसमोरच राहुल वाघ व त्याचे मित्र समीर व गुड्या यांनी त्याला गाठले. लग्नावरून शिविगाळ सुरू केली. तेवढ्यावरच न थांबता तिघांनी चापटबुक्क्यांनी मारहाण केली. हातातील जड वस्तू राहुलने आकाशच्या डोक्यात मारली. त्यामुळे डोके फुटले. परत दिसला तर तुझे हात- पाय तोडून टाकू, अशी धमकी राहुलने दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी राहुलसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.