लग्नाला 500 लोकांना उपस्थितीची परवानगी द्या; अन्यथा आत्मदहन करू!
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे मंडप डेकोरेशन, लॉन्स व केटर्स व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्ज घेऊन व्यवसाय उभे केले. मात्र कोरोनाने या व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यातील 10 हजारांपेक्षा जास्त व्यावसायिकांवर संकटांची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे आज, 15 मार्चला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी या व्यावसायिकांची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मांडली. तसेच समारंभांना 50 ऐवजी 500 जणांना हजर राहण्याची परवानगी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कर्ज कसे फेडावे अशी चिंता सतावत असल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली असून काही व्यवसायिकांनी यावेळी आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा दिला. कोरोनाच्या नियमानुसार कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये 50 व्यक्ती उपस्थित राहण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिक मंडप किवा लॉन्स तसेच केटर्स यांना बोलावत नाहीत. त्यामुळे व्यवसाय ठप्प झाले आहेत. आता सार्वजनिक कार्यक्रमामध्ये 50 ऐवजी 500 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्या, अशी मागणी या व्यावसायिकांनी जिल्ह्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ही परवानगी दिली नाही तर आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी व्यावसायिकांनी दिला आहे.