विकृती… शेतात घुसून पिकांवर तणनाशक फवारले; शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान; तिघा बापलेकांविरुद्ध गुन्हा
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेजारील शेतकऱ्याच्या उभ्या पिकावर तणनाशक फवारून अडीच लाख रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यावरून पोलिसांनी काल, ११ ऑगस्टला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नागझरी (ता. मेहकर) येथील शेतकरी नितीन दिलीप गवई यांनी तक्रार दिली. ते काल ११ ऑगस्ट रोजी शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी गेले होते. नितीन गवई यांनी शेडनेटमध्ये मिरची आणि काकडीचे पीक घेतले होते. शेतात गेल्यानंतर त्यांना पीक पूर्णपणे जळालेले दिसले. त्यांना तिघा बापलेकांवर संशय आल्याने ते वामन रामभाऊ गवई, प्रमोद वामन गवई व राजू वामन गवई यांच्याकडे गेले व फवारणीबद्दल विचारणा केली असता हो आम्हीच तुझे पीक जाळले. तुझ्याकडून काय होते ते करून घे, असे तिघे बापलेक म्हणाल्याचे तक्रारीत नमूद आहे. पीक जाळल्याने अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून वामन गवई व त्यांची मुले प्रमोद व राजूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.