शिवराज्यभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषदेत उभारली गुढी
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सतत महाराष्ट्रावर कोणते ना कोणते संकट येत आहे. अतिवृष्टी आहे, वादळ आहे, कोरोनासारख्या महामारीतून अर्थव्यवस्था सावरत असताना आज आपण महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं रयतेचं राज्य महाराष्ट्रात निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काल, 6 जूनला केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद आवारात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली व पूजन करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्ष कमलताई जालिंदर बुधवत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयावरसुद्धा गुढी उभारण्यात येऊन हा दिन साजरा करण्यात आला.