शेलोडी ग्रामपंचायतीच्या कारभाराचे गौडबंगाल… ग्रामस्थाची “गंभीर’ तक्रार; सरपंच म्हणतात, तक्रारच “निराधार’
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रजिस्ट्रीची नोंद शेलोडी (ता. चिखली) येथील ग्रामपंचायत घेत नसल्याची तक्रार ग्रामस्थ प्रभाकर रक्ताडे यांनी केली आहे. आर्थिक देवाणघेवाणीमुळेच ही प्रकरणे पेंडिंग ठेवण्यात येत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. याबद्दल बुलडाणा लाइव्हने सरपंच श्री. रिठे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी ग्रामपंचायतीकडे अशी कोणतीही प्रकरणे पेंडिंग नाहीत. केवळ रक्ताडे यांचे प्रकरण त्यांच्या चुलत्याने आक्षेप घेतल्यामुळे पेंडिंग आहे, असे सांगितले.
तक्रारीत श्री. रक्ताडे यांनी म्हटले आहे, की विनंती करून, रितसर अर्ज करूनही शेलोडी ग्रामपंचायतीने नोंद करून घेतली नाही. ग्रामपंचायतीने दिलेल्या ८ अ वरून रजिस्ट्री करून तीच ग्रामपंचायत नोंद घेत नसेल तर काही आर्थिक देवाणघेवाणीची शंका येते. अशी गावात ३० ते ३५ प्रकरणे आहेत. कुणाच्या सातबाऱ्यावर नोंद आहे, मात्र ग्रामपंचायत नोंद घेत नाही. केवळ मर्जीतील लोकांची नोंद होत आहे. ग्रामपंचायतीशी संबंधित अनेक अशी खोळंबली आहेत. प्रमाणपत्र, शपथपत्र देऊनही ८ अ नक्कलला वारस लावत नाहीत. तीन महिन्यांपासून हे प्रकरण पेंडिंग आहे, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.