संशयावरून पत्नीसोबत त्याचे भांडण सुरू होते, “हा’ मध्यस्थी करायला गेला अन् जीव गमावला!!
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घराशेजारी राहणाऱ्या पती- पत्नीच्या वादात मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणावरच दुसऱ्या दिवशी खंजीराचे वार करण्यात आले होते. ही घटना ११ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठला मेहकर शहरातील पैनगंगानगरात घडली होती. हल्ल्यात गंभीर जखमी आसिफशहा मकबूल शहा (३०) याच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल, २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हल्लेखोरांविरुद्ध रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
उपचार घेत असताना जखमी आसिफने पोलिसांना जबाब दिला होता. त्यानुसार त्याच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर सलीम शाह कुटुंबासह राहतात. ते आसिफचे दूरचे नातेवाईक आहेत. सलीम शाह त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी तिला मारहाण करायचा. १० सप्टेंबर रोजी सलीमचा पत्नीसोबत वाद सुरू होता. वाद मिटवण्यासाठी आसिफने मध्यस्थी केली व भांडण करू नको, असे समजाविले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आसिफ त्याच्या वडिलांसह घरासमोर उभा असताना सलीम तिथे आला व त्याने पांढऱ्या रुमालात लपवून आणलेले खंजीर आसिफच्या पोटात खुपसले. त्यामुळे गंभीर जखमी आसिफ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
यावेळी सलीमचा मुलगा शाहिदने देखील सलीमला मदत केली होती. जखमी आसिफला त्याचे वडील व लहान भाऊ वाचवायला आले असता “तुझे तो मैने जान सें मारा अब तेरे भाई और पिताजी को भी जानसे मार दूंगा’, अशी धमकी सलीमने दिली व तो पळून गेला. जखमी आसिफवर गेल्या १० दिवसांपासून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल त्याची मृत्यशी झुंज अखेर संपली.