स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री डॉ. शिंगणेंना विश्वास : कोरोनाला हरवत जिल्हा सर्वच क्षेत्रात नव्या उमेदीने भरारी घेणार, मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असून, देशाने विविध अडचणी, समस्या व आव्हानांवर मात करत नेत्रदिपक प्रगती साधली आहे. मात्र सध्या आपण कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटातून जात आहोत. कोरोनाला मात देण्यासाठी राज्य शासन सर्व ताकदीनिशी लढत आहे. शासनाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केलेली आहे. कोरोनाशी लढत अर्थव्यवस्था सांभाळण्याचे मोठे आव्हान …
 
स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री डॉ. शिंगणेंना विश्वास : कोरोनाला हरवत जिल्हा सर्वच क्षेत्रात नव्या उमेदीने भरारी घेणार, मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असून, देशाने विविध अडचणी, समस्या व आव्हानांवर मात करत नेत्रदिपक प्रगती साधली आहे. मात्र सध्या आपण कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटातून जात आहोत. कोरोनाला मात देण्यासाठी राज्य शासन सर्व ताकदीनिशी लढत आहे. शासनाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केलेली आहे. कोरोनाशी लढत अर्थव्यवस्था सांभाळण्याचे मोठे आव्हान आहे. केंद्र शासनाने आत्मनिर्भर अभियानाची घोषणा करत अर्थव्यवस्था रूळावर आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूला हरवत जिल्हा सर्वच क्षेत्रात नव्या उमेदीने भरारी घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काल, १५ ऑगस्‍टला केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात ध्वजवंदनानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषद अध्यक्षा मनिषाताई पवार, आमदार संजय गायकवाड, जि. प. उपाध्यक्षा कमलताई बुधवत, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आदींसह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात येत असलेला प्रत्येक निर्णय, दिलेली प्रत्येक सूचना याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अगदी मनापासून काम करीत असल्याचे सांगत पालकमंत्री म्‍हणाले, की आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील 86 हजार 620 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दुसरी लाट नियंत्रणात येत नाही तोच कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा आरोग्य संस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये जास्त संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी बुलडाण्यात स्त्री रुग्णालय येथे 50 बेड, खामगाव व शेगाव येथे प्रत्येकी 50 बेड, इतर सर्व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी 15 बेड लहान बालकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यात पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. तसेच पाच प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. एकूण 10 प्रकल्पांमधून 10 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात 59.20 मेट्रिक टन क्षमतेच्या ऑक्सिजन टँकची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्ह्यात 102 केंद्रांमधून कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसींचे लसीकरण करण्यात येत आहे. आजपर्यंत 5 लक्ष 70 हजार 412 नागरिकांना पहिला डोस व 2 लक्ष 8 हजार 930 नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत जिल्ह्यात 1 लक्ष 71 हजार 17 लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 1 हजार 130 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व जिल्हा बँकेमार्फत 77 हजार 670 शेतकऱ्यांना 719.28 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कृषि निविष्ठा खरेदी करणे सोयीचे झाले. प्रधानमंत्री कृषि पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2020-21 मध्ये जिल्ह्यात सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांपैकी 26 हजार 299 शेतकऱ्यांना 17.92 कोटी रूपयांचा लाभ प्राप्त झाला आहे. तसेच या खरीपात सन 2021-22 अंतर्गत 2 लक्ष 26 हजार 209 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेतकऱ्यांना थेट बांधावर खते व बियाणे पुरवठा मोहिम राबविण्यात आली. मोहिमेत 1158 शेतकरी गटांनी 27 हजार 483 शेतकऱ्यांना 1 हजार 435 मेट्रिक टन खत व 7 हजार 788 मेट्रिक टन बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा करण्यात आला, अशी माहितीही पालकमंत्र्यांनी दिली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत शासनाने माहे मेपासून शिधापत्रिकाधारक कुटूंबातील प्रती व्यक्तीस तीन किलो गहू व दोन किलो मोफत तांदूळ वितरीत केला. तसेच या कोरोनाच्या संकट काळात गरीब व आर्थिक दुर्बल घटकांना विनामूल्य जिल्ह्यात 17 शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून जानेवारीपासून 4 लक्ष 55 हजार शिव भोजन थाळी ‘पॅकींग फूड’ स्वरुपात देण्यात आली आहे.

राज्य शासनाने महत्वाकांक्षी रोजगार हमी योजना अधिक व्यापक करण्यासाठी पाहिजे ते काम हे ब्रीद घेवून योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्ह्यात 10 हजार 162 शेल्फवरील कामे आहेत. सन 2020-21 मध्ये आतापर्यंत 42 हजार 511 व्यक्तींना रोहयोच्या माध्यमातून रोजगार देण्यात आला आहे. पालकमंत्री पांदण रस्ते योजने अंतर्गत जिल्ह्यात 585 किलोमीटर लांबीचे 350 रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल सुरक्षितपणे घरी पोहोचविणे शक्य झाले आहे. कोरोनामुळे आई व वडील दोन्ही मृत्यू पावल्यामुळे जिल्ह्यात 12 बालके अनाथ झाली. त्यांना शासनाच्या बाल संगोपन योजनेतून 5 लक्ष रुपये अर्थसहाय्य मुदत ठेव म्हणून देण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात आई किंवा वडील दोन्ही गमावलेली 333 बालके आहेत. या बालकांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा कृती दल कार्यरत आहे, असेही पालकमंत्री म्‍हणाले. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकासासाठी शासन काम करीत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, की सिंदखेड राजा विकास आराखडा, लोणार सरोवर विकास आराखडा तसेच मेहुणा राजा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. मेहुणा राजा येथील संत चोखामेळा जन्म स्थळाचा विकास करण्यात येत आहे. पायाभूत सोयी सुविधा उभारून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे निश्चितच या परीसरातील रोजगारात वाढ होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागात या योजनेतून 15 हजार 388 घरकूल पूर्ण करण्यात आली आहे. जिगाव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 22 गावांपैकी 6 गावांतील पुनर्वसनाची 18 नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यात आली आहे. तसेच 10 गावांचे पूनर्वसन प्रगतिपथावर आहे. जल जीवन मिशनअंतर्गत 101 पाणी पुरवठा योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. लॉकडाऊन काळात कामगारांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे शासनाने 1500 रुपयांचे अर्थसहाय्य नोंदणीकृत बांधकाम कामगारांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यात 52 हजार कामगारांना सदर अर्थसहाय्याचा लाभ देण्यात आला. प्रतिबंधीत गर्भनिरोधक औषध साठा व विक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्यात धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातही कारवाई करण्यात आली. कोरोना संसर्ग काळात रेमडेसिव्हीर या औषधाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. या औषधाचा काळाबाजार करणाऱ्या 6 व्यक्तींविरूद्ध अन्न व औषध प्रशासनाने एफआयआर दाखल केले आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व सामाजिक सुरक्षा अंतर नियमांचे पालन करणे या त्रीसूत्रींचा उपयोग करावा, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सेनानी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री डॉ. शिंगणेंना विश्वास : कोरोनाला हरवत जिल्हा सर्वच क्षेत्रात नव्या उमेदीने भरारी घेणार, मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा

धनादेश वितरण व सत्कार
राज्य शासनामार्फत शहीद जवानांच्या अवलंबितांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. त्यानुसार शहीद नायक प्रदीप साहेबराव मांदळे यांच्या वीरपत्नी श्रीमती कांचन प्रदीप मांदळे यांना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते ताम्रपत्र देण्यात आले. तसेच सेवारत सैनिक नायक विद्याधर दामोदर शेळके (रा. बोरगाव वसू) यांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अवलंबितांच्यावतीने प्रकाश दामोधर शेळके यांना फिजीकल कॅज्युल्टी आर्थिक मदतीचा धनादेश यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्याहस्ते देण्यात आला. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने विविध आवास योजनांना गतिमान करण्यासाठी राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन पंचायत समिती व ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. यामध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्याचा प्रथम पुरस्कार सभापती व गटविकास अधिकारी, मेहकर यांना व द्वितीय पुरस्कार सभापती व गटविकास अधिकारी, मोताळा यांना प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये पहिला पुरस्कार लासुरा खुर्द (ता. शेगाव) ग्रामपंचायत सरपंच, सचिव यांना व द्वितीय पुरस्कार सरपंच व सचिव दाताळा (ता. मलकापूर) यांना प्रदान करण्यात आला.

शेलोडीत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजवंदन
शेलोडी येथे स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सरपंच समाधान रिठे व पदाधिकाऱ्यांनी ध्वजवंदनाचा मान सियाचीन भागात सेवा देऊन नुकतेच निवृत्त झालेले भारतीय जवान निवृत्ती अरुण बळप यांना दिला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर श्री. बळप यांनी ध्वजवंदन केले. त्यानंतर जिल्हा परिषद मराठी शाळेत शालेय व्यवस्थापन समितीने विनोद नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेऊन निवृत्त हवालदार विश्वनाथ जायगुडे यांच्या हस्ते शाळेत ध्वजवंदन केले. सैनिक स्तंभाजवळ निवृत्त सैनिक त्र्यंबक गवई यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी योगेश रामधन शेवाळे, राम सुभाष हलकरे, माजी सैनिक राजू पवार, राजेंद्र नेमाने, बापू सकुंडे, ज्ञानदेव कळस्कर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सेवानिवृत्त सैनिक विशाल कापसे, शिवाजी खोडके, रामदास शेडगे हेसुद्धा वेळात वेळ काढून उपस्थित होते. गावातील सर्व नागरिकांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री डॉ. शिंगणेंना विश्वास : कोरोनाला हरवत जिल्हा सर्वच क्षेत्रात नव्या उमेदीने भरारी घेणार, मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा

सावखेड नागरे येथे ध्वजवंदन
सावखेड नागरे येथील श्रीमती प्रभावती काकू शिंगणे विद्यालयात मुख्याध्यापक अनंतकुमार अरुण खरात यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी श्री. वायाळ, श्री. नागरे, श्री. काळे, श्री. गवई, श्री. मुरकुटे, श्री. पालवे, श्री. काळुसे, श्री. जायभाय, गणेश मिसाळ आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री डॉ. शिंगणेंना विश्वास : कोरोनाला हरवत जिल्हा सर्वच क्षेत्रात नव्या उमेदीने भरारी घेणार, मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा