20 दिवसांवर मुलीचे लग्न अन् शेतकऱ्याने विष घेऊन संपवली जीवनयात्रा! मोताळा तालुक्यातील दुर्दैवी घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवघ्या 20 दिवसांवर मुलीचे लग्न आलेले असताना शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. लपाली (ता. मोताळा) येथे ही घटना काल 8 मार्चला घडली. रात्रीच त्यांना बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात भरती केले होते. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा मृत्यू झाला.
सुभाष रमेश लेहंगे (38, रा. लपाली) असे आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी काल शेतात विष घेतले होते. ही बाब नातेवाइकांच्या लक्षात येताच त्यांना आधी मोताळा येथील सामान्य रुग्णालयात व नंतर प्रकृती जास्तच बिघडल्याने बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्याकडे 2 एकर शेती असून, त्यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे कर्ज आहे. त्यातच मुलीचे लग्नही 20 दिवसांवर येऊन ठेपल्याने ते चिंताग्रस्त होते. त्यातच त्यांनी हा दुर्दैवी निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.