27 जानेवारीपासून 5 ते 8 वीचे वर्गही होणार सुरू; शाळा लागल्या पूर्वतयारीला! लाखो पालक, विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अखेर आपला शब्द पाळलाय! यामुळे आज ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाच्या धामधुमीत शाळा सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले. यामुळे सर्व शिक्षण संस्था अर्थात कर्मचार्यांनी हे वर्ग सुरू करण्यासाठी आजपासूनच कंबर कसल्याचे चित्र आहे. शालेय शिक्षण मंत्रालयाचे उप …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अखेर आपला शब्द पाळलाय! यामुळे आज ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाच्या धामधुमीत शाळा सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले. यामुळे सर्व शिक्षण संस्था अर्थात कर्मचार्‍यांनी हे वर्ग सुरू करण्यासाठी आजपासूनच कंबर कसल्याचे चित्र आहे.

शालेय शिक्षण मंत्रालयाचे उप सचिव राजेंद्र पवार यांनी या संदर्भातील आदेश आज 18 जानेवारी रोजी जारी केले आहेत. केंद्र व राज्य शासनाचे कोरोना विषयक सर्व निर्देश व मार्गदर्शक सूचना यांचे काटेकोर पालन करून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू करण्याचे सूचित करण्यात आले आहेत. आता कोरोनाचा धोका कमी झाल्याने व वर्ग 9 ते 12 वी चे वर्ग सुरळीतपणे सुरू असल्याने 5 ते 8 वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रारंभीच्या टप्प्यात 23 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील इयत्ता 9 ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यात आले. यासाठी शिक्षण विभागाला व संस्थांना तारेवरची कसरत करावी लागली. हजारो शिक्षकांच्या कोरोना विषयक चाचण्या व अहवालाने डोकेदुखी वाढल्याचे तेव्हा दिसून आले. यु डायसमधील माहितीनुसार जिल्ह्यातील अशा शाळांची संख्या 2475 इतकी आहे. 5 वी ते 12 वीच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमीअधिक 3 लाख 38 हजार इतकी आहे. यातील इयत्ता 5 ते 8 मधील सर्व माध्यमांच्या व खाजगी शासकीय शाळांमधील विद्यार्थी संख्या 1 लाख 85 हजार इतकी आहे. या 4 वर्गांना शिकविणार्‍या शिक्षकांची निश्‍चित संख्या उपलब्ध नसली तरी ती कमीअधिक 8 हजार असावी. यामुळे हे वर्ग सुरू करायचे तर शिक्षण विभाग व संस्थांना प्रचंड दगदग करावी लागणार आहे. शाळांचे सॅनिटायझेशन, पालकांचे संमतीपत्र, शिक्षकांच्या कोरोना विषयक आरटीपीसीआर चाचण्या, त्यांचे अहवाल संकलन अशा अनेक जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतील.