नांद्रा कोळीचे दोघे नाल्यात गेले वाहून; एकाने बाभळीला धरून वाचवले प्राण, दुसरा अद्याप बेपत्ताच
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांद्रा कोळी (ता. बुलडाणा) येथील एक तरुण आणि एक वृद्ध व्यक्ती शेताजवळील नाल्याला आलेल्या पुरात काल, २७ सप्टेंबरला रात्री वाहून गेले होते. त्यातील तरुणाने वाहून जात असताना सातशे मीटरवरील बाभळीच्या झाडाला धरल्याने प्राण वाचले. रात्रभर तो थंडीत कुडकुडत तिथेच होता. आज सकाळी या दोघांच्या शोधार्थ निघालेल्या ग्रामस्थांना तो गारठलेल्या अवस्थेत मिळून आला. त्यानंतर तातडीने शेकोटी करून त्याला उष्णता देण्यात आली. सध्या त्याची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. वृद्धाचा शोध मात्र सकाळी ११ पर्यंतही लागलेला नव्हता. राहुल दशरथ चौधरी (२७) व भगवान लक्ष्मण गोरे (५५, दोघे रा. नांद्राकोळी) हे दोघे वाहून गेले होते. पैकी राहुल सहिसलामत आहे. सुनील रामकृष्ण काळवाघे यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्याला आलेल्या पुरातून गाडी काढण्याच्या नादात ते वाहून गेले होते. शेडपासून १०० मीटर अंतरावर त्यांची मोटारसायकल नाल्याच्या कडेला आढळली. भगवान गोरे यांचा शोध गावकरी व प्रशासनाकडून युद्धपातळीवर घेतला जात आहे.